सद्य:स्थितीत शेतकऱ्यांनी आंबिया बहरासाठी बागा ताणावर सोडलेल्या आहेत. बागांना ताण देण्याचा कालावधी अंतिम टप्प्यात आला आहे. काही बागांचा ताण पूर्ण झाला असेल तर काहींना अजूनही पाहिजे तसा ताण बसलेला नसेल. नुकत्याच झालेल्या तुरळक पावसामुळे ताण अपुरा बसला असल्यास बागेतील आंबिया बहारातील फुलधारणेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. खत व पाणी व्यवस्थापन
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तापमानात वाढ होताच हलके ओलित करावे. ताण तोडताना हलक्या ओलिताआधी प्रत्येक झाडाला नत्र ६०० ग्रॅम अधिक स्फुरद ४०० ग्रॅम अधिक पालाश ४०० ग्रॅम ही भरखते द्यावीत. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ठिबक सिंचन उपलब्ध असल्यास, १ ते ४ वर्षाच्या झाडांना ७ ते ३० लिटर, ५ ते ७ वर्षाच्या झाडांना ४४ ते ७२ लिटर आणि ८ वर्षावरील झाडांना ८२ ते १०२ लिटर पाणी प्रति दिवस जमिनीच्या प्रकारानुसार द्यावे. कीड व्यवस्थापन सिट्रस सायला
सिट्रस सायलाची पिल्ले नवीन आलेल्या पानांतील रस शोषण करतात. नवतीच्या पानांची गळती होऊन फांद्या सुकतात. याचा फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. या किडीद्वारे सिट्रस ग्रीनिंग आणि शेंडेमर रोगाचा प्रसार होतो. झाडावरील फुले आणि फळे गळून पडतात. झाडावर एकही फळ येत नाही. डायमिथोएट २ मिलि किंवा ॲसिफेट २ ग्रॅम किंवाइमिडाक्लोप्रिड ०.५ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे नवतीवर फवारणी करावी. दुसरी फवारणी १० दिवसानंतर कीटकनाशक बदलून करावी. आंबिया बहराच्या वेळी जिब्रेलिक आम्ल १ ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. झाडाच्या बुंध्यामधून डिंकाचा स्राव सुरू असल्यास, तो डिंक पटाशीने खरडून ती जागा पोटॅशिअम परमॅंग्नेट १० ग्रॅम प्रति लिटर पाणी द्रावणाने धुवावी. त्यानंतर मेटालॅक्झिल अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ५० ग्रॅम किंवा फोसेटील एएल ५० ग्रॅम प्रति लिटर पाणी हे मलम ब्रशने लावावे. झाडाच्या बुंध्यावर दोन फुटांपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. बोर्डो पेस्ट तयार करण्याकरिता ५ लिटर पाण्यात मोरचूद १ किलो आणि पाच लिटर पाण्यात चुना १ किलो वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मिश्रणे एकत्र करून पेस्ट तयार करावी.(टीप ः वरील शिफारशी लेबलक्लेम आहेत.)
संपर्कः डॉ. सुरेंद्र पाटील, ९८८१७३५३५३ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.